मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीवर मधमाशांचा हल्ला !!

Foto
जालना  : मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या एका महत्त्वाच्या बैठकीदरम्यान अचानक मधमाशांच्या हल्ल्याने मोठा गोंधळ उडाला. या अनपेक्षित घटनेमुळे बैठक काही थांबवावी लागली आणि उपस्थितांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

आज रविवारी (दि. 21) मराठवाड्यातील निवडक समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यातील समन्वयकांशी चर्चा करणार होते. मात्र, चर्चेला सुरुवात होण्याच्या काही वेळातच अचानक मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात अनेक समन्वयक आणि कार्यकर्त्यांना मधमाशांनी चावे घेतल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकारामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि लोकांनी इकडे-तिकडे पळापळ सुरू केली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, समन्वयकांनी तात्काळ मनोज जरांगेंना सुरक्षित स्थळी हलवलं. कोणतीही गंभीर इजा होऊ नये म्हणून त्यांना त्वरित बैठकस्थळी बाजूला नेण्यात आलं. सहकाऱ्यांनी गळ्यातील उपरणी काढून मनोज जरांगे पाटील यांना झाकले आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याची माहिती समोर येत आहे. 

मनोज जरांगेंचा इशारा

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी सध्या मराठा आरक्षण जीआर रद्द करण्यासाठी रान पेटवलं आहे. ते ठिकठिकाणी त्यांची भूमिका जाहीर करत आहेत. राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात त्यांनी ओबीसी समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसले. गरज पडली तर दिल्लीपर्यंत लढा देण्याचा निर्धारही भुजबळांनी व्यक्त केला आहे. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळांना काय करायचं ते करुद्यात, त्याची काही अडचण नाही. जितका त्रास मराठ्यांना दिला तेवढं मराठे खोलात घुसतील. मराठ्यांनी कधी कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. पण मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध होत असेल तर मग मराठे पण त्याता उत्तर देणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना दिला आहे.